पुणे : ‘लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेच्या महायुतीला मोठे यश मिळेल. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. आक्रमकतेमुळे शरद पवार यांना जास्त जागा मिळतील, तर राहुल गांधी, राज ठाकरे यांची स्थिती ‘जैसे थे’ राहील. आदित्य ठाकरे यांचा उदय हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य असेल,’ असे भाकीत ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवले आहे.
ज्योतिष ज्ञान दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले. त्या वेळी ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे भाकीत’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून अभ्यासक, लेखक वा. ल. मंजुळ आणि प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती प्रतिभा शाहू मोडक उपस्थित होत्या. नवीन वर्ष कसे राहील, या विषयावरही परिसंवादात चर्चा करण्यात आली.
या परिसंवादात वक्ते म्हणून ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर यांच्यासह विजय जकातदार आणि जयश्री बेलसरे हे मान्यवर सहभागी झाले होते.
सिद्धेश्वर मारटकर म्हणाले, ‘सत्ताधारी पक्षाच्या पत्रिकेतील दशम स्थान, रवी पाहून, विरोधी पक्षाच्या पत्रिकेतील चौथे स्थान पाहून भविष्य सांगितले जाते. रवी बिघडला की संक्रमण होते, असा अनुभव आहे. गुरू ग्रह नोव्हेंबरमध्ये धनू राशीत येत असल्याने भाजपला फायदा मिळेल. हर्षल ग्रह युतीला जास्तीत जास्त जागा मिळवून देईल. लोकसभेप्रमाणेच मित्रपक्षांच्या मदतीने मोठे यश मिळेल. आदित्य ठाकरेंचा उदय हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरेल. त्यांच्या मकर राशीत शनी, राहू, चंद्र आल्याने घबाड मिळू शकते. घराण्यातील नातेसंबंधांना, पिता-पुत्रांना, नव्या पिढीला चांगले दिवस आहेत.’
‘सिंह राशीचा चंद्र देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद देईल. फडणवीस यांच्या राशीत कर्केचा मंगळ आहे. धनू राशीचा शनी नवपंचम योगात आहे. त्यांना मोठ्या संधी मिळत राहतील. दशमातील हर्षल त्यांना केंद्रात नेऊ शकतो. चंद्रकांत पाटील यांना पुढे संधी मिळू शकते. त्यांना आठवा शनी असल्याने लढत द्यावी लागत आहे,’ असे मारटकर म्हणाले.
‘उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यात रवी कर्केचा आहे. शनीचे पाठबळ नसल्याने त्यांना मुख्यमंत्री होता आले नाही. काँग्रेसच्या थोरात यांच्या राशीत चुकीच्या काळात नेतृत्व आले. राज ठाकरे, राहुल गांधी यांची परिस्थिती ‘जैसे थे’ राहील. शरद पवार यांच्या राशीत रवीवरून गुरूचे भ्रमण असल्याने आक्रमकता वाढली आहे. ती काही जागा जास्त देऊन जाईल. सप्टेबर २०२०नंतर अर्थव्यवस्था सुधारेल. नवीन वर्षात युद्धजन्य परिस्थिती, कडक उन्हाळा, तीव्र पावसाळा अशी परिस्थिती ओढवू शकते,’ असेही मारटकर म्हणाले.
जयश्री बेलसरे म्हणाल्या, ‘पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या राशीची फळे मिळत आहेत. ती पुढेही मिळत राहतील.’
‘ज्योतिषाने सल्ला, मार्गदर्शन करण्याऐवजी समुपदेशन करावे,’ असे मत विजय जकातदार यांनी व्यक्त केले.
प्रतिभा मोडक म्हणाल्या, ‘कौटुंबिक, सामाजिक सल्ल्यासाठी ज्योतिषाची आवश्यकता असते. पाच वर्षांत ज्योतिषाची गरज भासली नाही, तरी निवडणूक काळात ही आवश्यकता जरा वाढते. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून भविष्यवाणी करावी आणि वाचासिद्धीचा अनुभव घ्यावा.’
वा. ल. मंजूळ म्हणाले, ‘राजकारणात अस्थिरता आहे. त्यावर भविष्यवाणी वर्तवणे अवघड असते; पण मारटकर यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. अस्थिर जीवनात ज्योतिषाचे मार्गदर्शन दिलासा देऊन जाते.’
चंद्रशेखर बिडवाई, पल्लवी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.